पुस्तक प्रकाशन 2022

भरारी पुस्तक प्रकाशन

भाजपच्या विविध राष्ट्रीय पदांवर आणि आमदार आपल्या भाषणातून, आपल्या कार्यातून लोकांमध्ये ओळख निर्माण करणार्‍या डॉ. कांताताई नलावडे या येणार्‍या काळात साहित्यक्षेत्रातही ‘भरारी’ घेतील, असा विश्‍वास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. राजकारण क्षणभंगुर तर साहित्य शाश्‍वत असते, असेही ते म्हणाले.

डॉ. कांताताई नलावडे यांच्या ‘भरारी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ नाट्यकर्मी, पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ लेखक

डॉ. शिरीष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, अनेकदा कथासंग्रह, कादंबरी यांना प्रकाशन संस्था

मिळतात. ग्रंथाली प्रकाशनने नफातोट्याचा विचार न करता काव्यसंग्रह प्रकाशित केला, याचं कौतुक वाटतं. मला विश्‍वास वाटतो की, डॉ. कांताताई नलावडे यांच्या 25व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य मलाच मिळेल मला आनंद वाटतो, की कांताताई यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सहवास मिळाला आणि त्यामुळे त्यांची कवितांची ओळख अधिक गडद झाली, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

या प्रसंगी बोलताना डॉ. कांताताई नलावडे म्हणाल्या हा काव्यसंग्रह वाचकांच्या हाती देताना मनात थोडी हुरहुर, भावनांचा कल्लोळ आहे. आयुष्यात मिळालेले अनुभवांचे गाठोडे तुमच्याकडे सुपूर्द करताना जग हे विविधतेने कसे नटलेले आहे, दुःखितांची मने पारखताना, सुवर्णमध्य दाखवताना, निसर्गाच्याही भावच्छटा मला भावल्या त्या सादर केल्या आहेत. खरं तर हा एक छोटासा प्रयत्न आहे. राजकारणाच्या धावपळीत, प्रवासातल्या पळापळीत जे टिपले, जे भावले, उमगले ते कागदावर उतरवण्याचा छंद जोपासला आहे. या प्रसंगी त्यांनी दोन कवितांचे वाचन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

पद्मश्री वामन केंद्रे म्हणाले, नेता आणि अभिनेता जमिनीशी बांधलेला हवा, तसेच लेखक आणि कवी यांना संवेदनशील मन हवे, तरच आपण चांगले लिहू शकतो. डॉ. कांताताई राजकारणात असताना त्यांनी व्हॉइस कल्चर केले, कारण त्यांना आवाजावर पकड हवी होती. अभ्यासक्रम शिकत असताना त्या उत्कृष्ट विद्यार्थिनी होत्या. चांगले बोलण्यासाठी आधी ऐकायला शिकले पाहिजे हा दिलेला मंत्र त्यांनी पाळला. कला, साहित्य, संगीत, सिनेमा, नाटक ही माध्यमे आपल्यात कला रुजवण्याचे काम करतात; आणि ही माध्यमे मन गुंतवून ठेवत असल्याने आपण मानसिकदृष्ट्या सुदृढ राहतो.

प्रसिद्ध पटकथाकार आणि साहित्यिक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यावेळी म्हणाले, डॉ. कांताताई नलावडे या विद्वान आणि प्रतिभावान आहेत. माझी विद्यार्थिनी म्हणून मला त्याच्या ‘भरारी’चे कौतुक वाटते. आमदार म्हणून काम करताना त्यांनी विविध प्रश्‍न मार्गी लावण्यात पुढाकार घेतला तसे कवयित्री म्हणून आपल्या लेखणीतून समाजातील परिस्थितीवर लिहिले आहे.

डॉ. कांताताईंच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी खास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले तर कार्यक्रमाची मांडणी व संयोजन प्रसिद्ध लेखिका व सिनेपत्रकार अनिता पाध्ये यांनी पाहिले. ग्रंथालीतर्फे डॉ. लतिका भानुशाली यांनी प्रास्ताविक केले.

राम कोंडीलकर

Back to list